
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नमंजुषेत कामठी येथील सौ. किरणताई पुष्पराज मेश्राम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या १० पैकी १० प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देत त्यांनी देशभरातील अव्वल ३० स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
२०१४ मध्ये विजया दशमीच्या दिवशी सुरू झालेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम आज सामाजिक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे १२९ भाग प्रसारित झाले असून प्रत्येक भागानंतर ‘नमो अॅप’वर घेण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषेत हजारो नागरिक सहभागी होतात. या उपक्रमातून राष्ट्रउभारणीत सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन दिले जाते.
प्रश्नमंजुषेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना ‘मन की बात @100 : इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस’ हे ब्लूकाफ्ट फाउंडेशनने प्रकाशित केलेले पुस्तक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.
या पुस्तकामध्ये ‘मन की बात’मधून मांडण्यात आलेल्या विचारांचा, सकारात्मकतेचा आणि जनचळवळींना मिळालेल्या प्रतिसादाचा वेध घेण्यात आला आहे.
किरणताई मेश्राम यांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने पाठविण्यात आलेले प्रशस्तीपत्र आणि ‘मन की बात’ पुस्तक त्यांना प्रदान करण्यात आले.
कामठी परिसरात त्यांच्या या यशाचे कौतुक होत असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रहिताच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत देशपातळीवर ठसा उमटविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.








