Published On : Sat, Jan 18th, 2020

सभी रोगों की बस एक दवाई, घर में रखे साफसफाई

Advertisement

मम्मी पापा यू टू अभियान : स्वच्छतेचा संदेश मानवी साखळीतून विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

नागपूर: ‘सभी रोगों की बस एक दवाई, घर में रखे साफसफाई’, ‘अपना देश भी साफ हो, इसलिए हम सबका साथ हो’, ‘स्वच्छता का करोगे जब काम, विकसित राष्ट्रो में आएगा अपना नाम’,‘हम सबका यही सपना, स्वच्छ भारत हो अपना’ अशा घोषणांनी आज नागपुरातील रस्ते दुमदुमून गेले. नागपूर शहरातील विविध चौकात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली आणि स्वच्छतेच्या उद्देशासाठी इतिहास रचला.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एका चांगल्या उद्देशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन, मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती. नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने १३ ते १९ जानेवारी दरम्यान नागपुरात ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान राबविण्यात येत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, वाहतूक नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अभियानाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (ता. १७) नागपूर शहरातील विविध चौकांमध्ये त्या-त्या परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी साखळी तयार करून स्वच्छतेचा जयघोष केला. १३ तारखेला झालेल्या घोषवाक्य स्पर्धेदरम्यान तयार करण्यात आलेल्या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अभियानाचा उद्देश समजावून सांगितला.

झांशी राणी चौकात महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त अभिजीत बांगर, शिक्षण समितीचे सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांसोबत त्यांनीही स्वच्छतेचा जयघोष केला. यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक उपस्थित होते.

Advertisement

३६५ दिवस हा उत्साह कायम ठेवा : महापौर संदीप जोशी
नागपुरातील जनतेने स्वच्छता ही सवय म्हणून अंगीकारावी. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश लाखमोलाचा आहे. आई-बाबांना ज्या सवयी आहेत, त्याच मुलांमध्ये उतरतात. परंतु आजची पिढी जागरुक आहे. खर्रा खाऊन थुंकणाऱ्या वडिलांना मुलगा ‘असे करु नका’ म्हणून सांगतो, हे चित्र सकारात्मक आहे. विद्यार्थ्यांनी अभियानादरम्यानच्या विविध स्पर्धांत आणि मानवी साखळीदरम्यान दाखविलेला उत्साह खूप काही सांगून जातो. हा उत्साह वर्षातील ३६५ दिवसही कायम राहावा. या उत्साहापासून नागरिकांनीही धडा घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केली.

स्वच्छतेच्या दिशेने सकारात्मक पाऊल : आयुक्त अभिजीत बांगर
‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान शहर स्वच्छतेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने आणि शहरातील नागरिकांना चांगल्या सवयी लागण्याच्या दृष्टीने अभियानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहरभरात तयार केलेल्या मानवी साखळीने इतिहास रचला. भविष्यात या अभियानाची आणि मानवी साखळीची नक्कीच दखल घेतली जाईल. स्वच्छता अभियानाचे नाव आले की या अभियानाचा उल्लेख नक्कीच होईल, असे गौरवोद्‌गार मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी काढले.

नगरसेवक-अधिकाऱ्यांनी वाढविला उत्साह
मनपाच्या दहाही झोनअंतर्गत नागपूर शहरातील विविध चौकांत त्या-त्या भागातील शाळांनी मानवी साखळी तयार केली होती. प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील चौकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांचे कौतुक केले. अजनी चौकात माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. छत्रपती चौकात बँड आणि लेझीम पथकानेही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्रिमूर्ती नगर परिसरात शेषराव कोहडे विद्यालय आणि यशोदा प्राथमिक स्कूल, यशोदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनंतर विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभातफेरी काढून स्वच्छतेचा जयघोष केला.

झांशी राणी चौकातील मदनगोपाल अग्रवाल शाळेच्या शिक्षकांनी महापौर संदीप जोशी यांचे औक्षण केले. आकाशवाणी चौकात सेंट उर्सुला स्कूल आणि प्रॉव्हिडन्सच्या विद्यार्थ्यांनी चौकाच्या चारही बाजूंनी उभे राहून जयघोष केला. या ठिकाणीही महापौर संदीप जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणून विद्यार्थ्यांच्या घोषवाक्यांच्या फलकांनी प्रेरीत झालेल्या महापौर संदीप जोशी यांनी स्वत: त्यांच्या फलकाचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले आणि विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढला. भांडे प्लॉट, दिघोरी चौक, नंदनवन, जगनाडे चौक, सदर, इंदोरा चौक, सोमलवाडा चौक, काटोल नाका चौक, रामनगर चौक, रविनगर चौक आदी ठिकाणी चौकाच्या चारही बाजूंनी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला. सुमारे तीन लाखांवर विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.