Published On : Mon, Feb 4th, 2019

जोसेब इंडियाचा उपक्रम:मिनरल वॉटर एटीएममुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिकांना सुविधा : खोपडे

Advertisement

पाच रुपयात मिळणार १० लिटर पाणी

नागपूर: प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुध्द पाणी मिळावे हा त्याचा हक्क आहे. मात्र या लिटरभर पाण्यासाठी जादा पैसे वसूल केले जाते. शहरात बाहेरून येणारे प्रवासी, शाळा, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनाही वेळप्रसंगी जादा पैसे देउन पाणी विकत घ्यावे लागते. मात्र मिनरल वॉटर एटीएममुळे सर्वांनाच अगदी माफक दरात पाणी मिळणार असून यामुळे परिसरातील नागरिकांसह, विद्यार्थी व प्रवास्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग व जोसेब इंडिया यांच्या वतीने नंदनवन येथील के.डी.के. महाविद्यालयापुढे लावण्यात आलेल्या मिनरल वॉटर एटीएमचे रविवारी (ता. ३) आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, प्रतोद दिव्या धुरडे, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, समिती सदस्या मनिषा धावडे, अभिरूची राजगिरे, नगरसेविका कांता रारोकर, समिता चकोले, मनिषा कोठे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत, जोसेब इंडियाचे उपाध्यक्ष दिनेश रेड्डी, दिव्या कुबडे, संजय वैद्य उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, नंदनवन परिसरात बीएसएनएल कार्यालयापुढे एकीकडे के.डी.के. महाविद्यालय आहे तर दुस-या बाजूला शहर बस थांबा आहे. त्यामुळे येथे नेहमी विद्यार्थी व प्रवास्यांची रेलचेल असते. पाण्यासाठी अनेकदा विद्यार्थी व इतर नागरिकांना जवळच्या टप-यांवर जाउन पाणी विकत घ्यावे लागते. दररोजच्या या समस्येतून परिसरातील नागरिकांसह सर्वांनाच दिलासा मिळावा व त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने लावण्यात आलेले मिनरल वॉटर एटीएम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शहरातील जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी गरीब, मजूर कामगारांच्या वस्त्यांना प्रथम प्राध्यान्य देउन इतरही रहिवासी क्षेत्रांमध्ये असे मिनरल वॉटर एटीएम उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहनही आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी केले.

परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांनी प्रास्ताविकातून सदर योजनेची माहिती दिली. वॉटर एटीएममुळे अत्यंत माफक दरात पाणी मिळणार आहे. वॉटर एटीएममध्ये एक रूपयाचा शिक्का टाकल्यास ग्लासभर पाणी मिळेल तर दोन रूपयात एक लिटर, पाच रूपयांज १० लिटर व १० रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध मिनरल वॉटर मिळणार आहे. यामुळे शुद्ध पाण्याच्या नावावर अनेक कंपन्यांकडून होणारी नागरिकांची लूट थांबणार आहे, असेही परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे म्हणाले. मिनरल वॉटर एटीएमद्वारे २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध असणार आहे. कार्ड, नाणी आणि पेटीएमद्वारेही पाणी विकत घेता येईल. यासाठी किमान उर्जेचा वापर करण्यात येत असून रिमोट मॉनिटरींग सिस्टीम मार्फत हे मिनरल वॉटर एटीएम संचालित करण्यात येईल. पाण्याचा अपव्यय होउ नये व ते योग्य प्रकारे वितरीत व्हावे यासाठी फ्लो सेन्सर बसविण्यात आल्याचेही परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन परिवहन अभियंता योगेश कुंगे यांनी केले तर आभार परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मानले.