Published On : Mon, Jun 22nd, 2020

खवैयांची चव लक्षात घेता खाद्य पदार्थ बनावे : नितीन गडकरी

Advertisement

अन्न (फूड) उद्योजकांशी ई संवाद

नागपूर: ÷अन्न-खाद्य (फूड) उद्योगात रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. नवनवीन खाद्य पदार्थ लोकांना हवे असतात. त्यात संशोधन आवश्यक आहे. तसेच खवैयांना लागणारी पदार्थांची चव लक्षात घेता या उद्योगातील उद्योजकांनी खाद्य पदार्थ बनवावे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या पदाधिकार्‍यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सर्व जण चिंतित आहेत. यापूर्वीही आम्ही अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आणि नैराश्य दूर सारून समस्येचा सामना करावा लागणार आहे. आत्मविश्वास कायम ठेवायचा आहे. कोरोनासोबत जीवन जगण्याची पध्दती अवलंबून आपल्याला कामे करावी लागणार आहेत, असेही ते म्हणाले.

या क्षेत्राचा शेतकर्‍यांनाही अधिक फायदा होतो, असे सांगताना गडकरी म्हणाले- खाद्य पदार्थांसाठी लागणारा कच्चा माल शेतकर्‍यांकडूनच मिळतो. या उद्योगातही नवीन संशोधन झाले तर आपली उत्पादने निर्यातयोग्य होतील. एमएसएमईत अनेक उद्योगांची नोंद आहे. ज्यांची नसेल त्यांनी नोंद करावी. या विभागाची व्याख्याच आम्ही बदलून टाकली आहे. त्यामुळे फूड उद्योगालाही याचा फायदा घेता येईल. अन्न-खाद्य उद्योगाने वाहतूक खर्च, कामगार खर्च, विजेचा खर्च कमी केला गेला पाहिजे. तसेच दर्जात कोणताही समझोता नको, तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण टिकू शकणार आहोत, असेही ते म्हणाले.

एमएसएमईच्या ‘फंड ऑफ फंड’ योजनेत आम्ही 50 हजार कोटींची तरतूद केली आहे. जे उद्योगांचा जीएसटी रेकॉर्ड चांगला, आयकराच्या दृष्टीने जे उद्योग योग्य आहे. अशा उद्योगांना एमएसएमई स्टॉक एक्स्चेंचा फायदा होईल. यासाठी 15 टक्के ‘इक्विटी’ शासन देणार आहे. या उद्योगांना भागभांडवल उभारणीस मदत होईल. स्टॉक एक्स्चेंजमुळे एमएसएमईत परकीय गुंतवणूकही येईल.

फूड उद्योगात या क्षेत्रातील उद्योजकांनी नवीन उत्पादने कसे आणता येतील याचा विचार करावा. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवावे लागतील. यापुढे स्थलांतरित मजुरांवर अवलंबून राहता येणार नाही. या उद्योगांतील कामगारांना कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तयार करावे लागेल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, रोजगारामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असेही गडकरी म्हणाले.