
नागपूर – देशभरातील सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा दुहेरी नाही तर चौफेर फटका बसताना दिसत आहे. गेल्या अवघ्या 48 तासांत सोनं-चांदी, दूध, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्याने घरगुती बजेट कोलमडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी परकीय चलन बचतीसाठी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क वाढवल्याने बाजारात दरांनी विक्रमी उसळी घेतली. आयात शुल्क वाढीच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात सुमारे 22 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली.
महागाईचा दुसरा मोठा फटका दुधाच्या दरवाढीतून बसला. अमुल आणि मदर डेअरी यांनी पॅकेज्ड दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नव्या किंमती 14 मेपासून देशभर लागू करण्यात आल्या आहेत.
यानंतर इंधन दरवाढीने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली. तेल कंपन्यांनी 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर झाले आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह प्रमुख शहरांतही इंधन दर वाढले आहेत.
सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुंबईनंतर आता दिल्लीतही सीएनजी महाग झाले असून प्रति किलो दर 79.09 रुपयांवर पोहोचला आहे.
एकूणच, अन्नधान्यापासून इंधनापर्यंत सर्वच क्षेत्रात वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिकांचे मासिक बजेट बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








