
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मंगळवारी कॅबचालकांनी ‘नो पिक-अप, नो ड्रॉप’ असा बेमुदत बंद पुकारल्यामुळे विमानतळावर जाण्या-येण्याची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी विमानतळ परिसरात कॅबना प्रवेश रोखत निदर्शने केली, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
तापलेल्या उन्हात प्रवाशांना सुमारे एक किलोमीटर पायी चालत टर्मिनलकडे जावे लागले, तर काहींनी ५० रुपयांचा अतिरिक्त खर्च करून ई-रिक्शाचा पर्याय स्वीकारला. अचानक झालेल्या या संपामुळे विशेषतः वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांची अधिकच तारांबळ उडाली.
कॅबचालकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी दुर्लक्ष केले आहे. ‘टॅक्सी चालक-मालक संयुक्त कृती समिती’चे नेते दीपक साने यांनी सांगितले की, सध्या चालकांना प्रति किलोमीटर केवळ ९ ते १५ रुपये मिळतात, जे अत्यंत अपुरे आहे. त्यांनी किमान २८ रुपये प्रति किलोमीटर दर लागू करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच, बाईक टॅक्सी सेवांवर नियंत्रण आणावे किंवा त्या बंद कराव्यात, अशीही चालकांची प्रमुख मागणी आहे. बाईक टॅक्सीमुळे कॅबचालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नाही. प्रवाशांना गैरसोय झाली तरीच कदाचित संबंधित यंत्रणा जागी होईल,” असे साने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या बेमुदत संपामुळे नागपूर विमानतळावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.








