
नागपूर : शहरातील सुयोग नगर चौक, तुकाराम सभागृहाजवळ (नरेंद्र नगर) येथे ‘चवदार प्यावू’चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ. विद्या थोरात उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हरीश मोहिते, इंजिनियर प्रणव कुरेवार, समाजसेवक पप्पू थोरात, लादुराम कुमावत, श्री वाळके तसेच मांडवे यांनी उपस्थिती लावली.
यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ‘चवदार तळे’ सत्याग्रहाच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून दिली.
सर्वसामान्य आणि वंचित बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळावा यासाठी बाबासाहेबांनी उभारलेला संघर्ष हा सामाजिक समतेचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्या ऐतिहासिक सत्याग्रहाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील चार वर्षांपासून सुयोग नगर चौकात ‘चवदार ग्लोबल ग्रीन गुडनेस ऑर्गनायझेशन इंडिया थ्री’च्या वतीने ‘चवदार प्यावू’ उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद भोयर यांनी मानले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








