Published On : Sat, Nov 28th, 2020

‘देवेंद्र फडणवीसांच्या काळात नागपुरात गुंडगिरी वाढली’

Advertisement

मुंबई: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना नागपुरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गुंडगिरीला आळा घातला आहे. कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबले आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारला वर्षे पूर्ण झाले आहे. या वर्षभरात सरकारने आणि गृहखात्याचा प्रमुख म्हणून कोणकोणती कामे केली, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहमंत्री देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका आणि आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना, नागपुरात गुंडगिरी वाढली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पहिल्या दिवसापासूनच राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागपुरातील अनेक कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबले, असे ते म्हणाले.

‘तेव्हा नागपूर क्राइम कॅपिटल झालं होतं’ ऑरेंज सिटी अशी नागपूरची ओळख आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना, त्या काळात नागपुरातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. संपूर्ण देशात नागपूरची ओळख ही क्राइम सिटी म्हणून झाली होती. पण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील, नागपुरातील गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही नागपुरातील कुख्यात गुंडांना तुरुंगात पाठवलं. एकही गुंड बाहेर नाही. अनेकांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याला यशही मिळत आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यावर काम सुरू आहे. करोनामुळे मधल्या काळात कार्यवाही थांबली. प्रारूप तयार आहे. येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा विधीमंडळात मांडण्यात येईल. त्याला सर्व पक्षांचे आमदार एकमताने मंजुरी देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.