Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गुजरातसह इतर राज्यांत हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? वडेट्टीवारांचा सवाल

मराठी अस्तित्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप

नागपूर : राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वाद पेटला असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुजरातसह अन्य राज्यांत हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? हा निर्णय म्हणजे मराठी भाषेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात कक्षा पहिलीपासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला जातोय. मराठी ही आमची मातृभाषा आहे, ही भाषा संत परंपरेतून आलेली आहे, आमच्या अस्मितेची ओळख आहे. मग मग पहिलीपासून सक्ती का? पाचवीपासून का नाही?”

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, पण महाराष्ट्रात का?

वडेट्टीवार यांनी विचारले, “गुजरातमध्ये का सक्ती केली जात नाही? कोणाच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातच असा निर्णय लादला जातोय? कोणाला खुश करण्यासाठी हे होतंय? हा निर्णय म्हणजे मराठी भाषा संपवण्याचा डाव आहे.”

अजित पवारांवरही निशाणा-

या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “शरद पवार या निर्णयाच्या विरोधात आहेत, पण अजित पवार फक्त भूमिका मांडतात. त्यांनी कॅबिनेटमध्ये विरोध दर्शवणारा ठराव का आणला नाही? जर खरोखरच विरोधात असतील, तर त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी या निर्णयाच्या विरोधात कॅबिनेटमधून बाहेर पडावं,” अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली.

फडणवीस सरकारने घेतला निर्णय स्थगित-

दरम्यान, वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अंमलबजावणी तात्पुरती स्थगित करत सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, विरोधकांचा आरोप आहे की हा निर्णय मागे न घेता फक्त चर्चेचं आवरण देऊन मराठीवर अन्यायच केला जातो.

Advertisement
Advertisement