
नागपूर : एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीलाच विदर्भात उष्णतेची तीव्र लाट उसळली आहे. रविवारी नागपुरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, पारा ४१.४ अंशांवर पोहोचला.
नागपुरात शहरासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. ब्रह्मपुरी वगळता सर्वच ठिकाणी उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
दरम्यान, अकोला येथे देशातील सर्वाधिक ४३.१ अंश तापमानाची नोंद झाली, तर अमरावती येथे ४२.४ अंश तापमान नोंदवले गेले. त्यामुळे संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या तडाख्यात सापडला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, नागपूर व विदर्भात कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत दिवसाच्या तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उष्णतेची वाढती तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.








