
नागपूर : जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) परिस्थितीमुळे सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार, नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सकाळी ७.०० ते १०.३० या वेळेतच चालविण्यात येणार आहेत. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या मते, सध्या नागपूर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुलांना याचा अधिक धोका असल्याने शाळेच्या वेळेत बदल करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून जारी करण्यात आला आहे. संबंधित सर्व यंत्रणांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून शिक्षण विभागाला शाळांना तात्काळ सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पालकांनीही विद्यार्थ्यांची काळजी घेऊन उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.








