नागपूर – राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाड्यात १० टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. याशिवाय, प्रत्येक तिकिटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली असून, प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वीच भाड्यात वाढ करण्यात आलेली असताना पुन्हा हंगामी दरवाढ का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः सुट्टीच्या काळात गावी जाणारे, पर्यटनासाठी निघालेले आणि धार्मिक स्थळांकडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर एसटीचा वापर करतात. या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान ही वाढ लागू राहणार आहे.
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंधन दरवाढ, वाहनांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन यामुळे हा निर्णय घेणे आवश्यक ठरले. तसेच, मागील काळातील आर्थिक तुट भरून काढण्याचाही हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या कुटुंबांना या दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाडेवाढ असूनही अनेक ठिकाणी बस सेवा, स्वच्छता आणि वेळेचे पालन याबाबतच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे “दर वाढले, पण सुविधा मात्र अपुऱ्याच” अशी भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.









