
धाराशिव– राज्यात मागील दोन दिवसांपासून हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि वातावरणात निर्माण झालेल्या तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तास परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील स्थिती गंभीर-
धाराशिव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी सरींनी द्राक्षबागांना मोठा फटका दिला. तुळजापूर आणि कळंब परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बागांमध्ये रोगराई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
परभणी जिल्ह्यात रिमझिम पावसासह आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे गहू, ज्वारी आणि हरभरा पिके आडवी पडली. कापणीस तयार असलेल्या पिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बीड जिल्ह्यातील पाली परिसरात ज्वारी, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचल्याची तक्रार केली असून नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे.
विदर्भात गारपिटीचा फटका
वर्धा जिल्ह्यात वाघोली शिवारात गारांसह झालेल्या वादळी पावसाने टरबूज पिक पूर्णपणे आडवे झाले. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या टरबूजाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हिंगणघाट, देवळी आणि समुद्रपूर तालुक्यांत गहू व हरभरा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड आणि पुसद भागात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फुलशेतीला फटका दिला. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
तसेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. भिवापूर, हिंगणा आणि बुटीबोरी परिसरात आंब्याचा मोहोर, हरभरा, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांवर परिणाम झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पंचनाम्यांची प्रतीक्षा-
अनेक ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी अद्याप पंचनाम्यासाठी पोहोचले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासनाने तातडीने पाहणी करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








