Published On : Tue, Aug 14th, 2018

ग्रामविद्युत व्यवस्थापक योजना 1 सप्टेंबर पासून सुरू होणार प्रशिक्षण केंद्र

Advertisement

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule

नागपूर: ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामिण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न लवकर सुटावेत म्हणून महावितरणतर्फे ग्रामविद्युत व्यवस्थापक ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येईल. अशी सुचना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणाला दिली.

या योजनेमूळे राज्यातील ग्रामिण भागातील 23 हजार आयटीआय धारकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. सध्या नागपूर व लातूर मध्ये प्रशि‍क्षण केंद्रे चालू करण्यात येणार आहेत. महावितरण, आयुक्त, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व मुख्य अभियंता विद्युत निरिक्षक या प्रशिक्षण केंद्राची संयुक्त पाहणी करणार. प्रशिक्षणचा कालावधी एक महिन्याच असेल.

फ्रेंच्याईझी म्हणून मीटर रिंडींग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, वीजपुरवठा पुर्ववत करणे, डीओ फ्युज टाकणे, फ्युज कॉल तक्रारी अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती किंवा बदली करणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे ग्रामपंचायतींनी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामांकरिता प्रति विद्युत ग्राहक 9 रुपये शुल्क ग्रामपंचायतींना देण्यात येईल.

ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रतिग्राहक 9 रुपये प्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा 3000 रुपये यापैकी जे अधिक असेल ते महावितरण तर्फे देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे पद कंत्राटी राहील. ग्रामविद्युत व्यवस्थापकाने केलेल्या कामाच्या बदल्यात त्याला देय होणारी रक्कम देण्याबाबतची कार्यपध्दती ग्रामविकास विभागाकडून निश्चित करण्यात येईल. राज्यातील 3000 लोकसंख्यापर्यंतच्या 23617 ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येईल.