
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीला स्थगिती दिल्याने निवडणूक कार्यक्रमही पुढे ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वीच्या आराखड्यानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणनीती, मतदार भेटी, बैठका आणि पॅनेल उभारणीची तयारी सुरू केली होती. मात्र, आयोगाच्या निर्णयामुळे या सर्व हालचालींना तात्पुरता विराम मिळाला आहे.
सध्या राज्यभर विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेनंतर तयार होणारी सुधारित आणि अद्ययावत मतदार यादीच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
या निर्णयाचा परिणाम राज्यातील मुदत संपलेल्या सुमारे ७५४ ग्रामपंचायतींसह इतर ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेवर होणार आहे. सुधारित मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळली जाणार असल्याने अधिक अचूक आणि पारदर्शक मतदार यादी तयार होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अद्ययावत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच उमेदवारी अर्ज, छाननी, चिन्ह वाटप आणि मतदानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या वेळापत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




