नागपूर: समृद्धी महामार्गावर १ जुले २०२३ रोजी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण झाला होता की हे सर्व प्रवाशी जाळून खाक झाले होते.या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने २५ लाख रुपये देण्याची घोषणा करूनही केवळ ५ लाख रुपयेच नुकसान भरपाई दिली. यावर संताप व्यक्त करत पिडीत कुटुंबीयांनी शुक्रवारी संविधान चौकात ‘राम नाम जप’ आंदोलन केले. सायंकाळी आंदोलनकर्ते उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले. रात्री उशीरापर्यंत आंदोलनकर्ते संविधान चौकात ठाण मांडून बसले होते.
दरम्यान आंदोलनातील एका ७५ वर्षीय ज्येष्ठाची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात कुटुंबियांना ५ लाखांचीच मदत करण्यात आली.
उर्वरीत २० लाख रुपये शासनाने त्वरीत द्यावेत, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी वर्धाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ४४ दिवसांपासून आंदोलन सुरु केले. परंतु शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अखेर आंदोलनकर्त्यांनी नागपुरात धडक देत संविधान चौकात आंदोलन केले. दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळी आंदोलनकर्ते उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले.