Published On : Mon, Oct 30th, 2017

३१ ऑक्टोबरपासून काँग्रेसचा ‘जनआक्रोश’ सप्ताह, अहमदनगर मधून सुरुवात तर सांगलीत सांगता

Advertisement
Congress

Representational Pic

मुंबई: भाजप सरकारच्या तीन वर्षातील अपयशाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ३१ ऑक्टोबरपासून ‘जनआक्रोश’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश सप्ताहची सुरुवात नगरपासून होत आहे.

अहमदनगर नंतर ४ नोव्हेंबरला महाड, ५ नोव्हेंबरला उस्मानाबाद, ६ नोव्हेंबरला चंद्रपूर, ७ नोव्हेंबरला अमरावती येथे जनआक्रोश मेळावे आयोजित करण्यात आले आहेत तर ८ नोव्हेंबरला सांगली येथे नोटाबंदीची वर्षपूर्ती ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे.

अहमदनगरच्या मेळाव्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली लोकांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांना ऐतिहासिक कर्जमाफी देत असल्याचा मोठा गाजावाजा केला पण त्यातून शेतक-यांच्या हाती काहीच पडले नाही. शेतमालाला योग्य भाव नाही, तर दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे.

भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या काळात व्यापारी, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक समाजासह कोणताही घटक समाधानी नाही. मंत्र्यांचे दररोज भ्रष्टाचार उघड होत आहेत, पण सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी क्लीन चिट देत सुटले आहे, अशा सरकारला जाब विचाण्यासाठी काँग्रेस पक्ष या जनआक्रोश सप्ताहाच्या माध्यमातून राज्यभर रस्त्यावर उतरणार आहे.