नागपूर – शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागपूरकर त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी वीज जाण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत दोन्ही नेत्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अनेक आमदारांनी देखील वीजपुरवठ्याच्या समस्यांवर आवाज उठवला. रात्रीच्या वेळी वीज गायब होण्यामुळे नागरिकांना उकाड्याने त्रास होत असल्याचंही अधोरेखित करण्यात आलं.
अधिकाऱ्यांना या त्रुटींचं समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने फडणवीस आणि गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश दिले. यासोबतच नागपूरसाठी स्वतंत्र बैठक घेऊन नेमक्या अडचणी ओळखून तत्काळ उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.