Published On : Mon, Feb 19th, 2018

शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 25 जखमी

Advertisement

कोल्हापूर : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे. नागाव गावाजवळ ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात 25 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, आज पहाटेच्या साडे चार वाजता सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते. सांगलीला जात असताना समोरून आलेल्या बाइकला चुकविताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच ट्रक कलंडला. त्यामुळे ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं.