नागपूर – नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात घडलेली घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, ती संपूर्ण न्यायव्यवस्थेवरच घाव ठरते आहे. प्रख्यात विधिज्ञ अॅड. चंद्रशेखर शर्मा यांच्यावर एका सुनियोजित कटाअंतर्गत जवळपास १० ते १२ जणांच्या टोळीने निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यामागे एका महिलेचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आले असून, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
डीजेच्या वादातून हिंसाचारापर्यंतचा प्रवास-
ही घटना १ जूनपासून सुरू झाली. डीजेच्या आवाजावरून निर्माण झालेला किरकोळ वाद, नऊ दिवसांनी हिंसक रूप घेईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पीडितेच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी अक्षय मातकरने अश्लील चाळे केले. हे सर्व कृत्य सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. घाबरलेल्या महिलेने आपला पती बोलावला आणि नंतर अॅड. शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्वरित 112 वर कॉल करत पोलिसांना बोलावले. मात्र, पोलीस केवळ दोन्ही पक्षांना समज देऊन प्रकरण थांबवत पुढे गेले – आणि पुढील घडामोडींना मार्ग मोकळा झाला.
रात्र होताच रक्तरंजित हल्ला-
९ जूनच्या रात्री जेवण करून परतत असताना अॅड. शर्मा व पीडित कुटुंबावर अचानक हल्ला चढवण्यात आला. आरोपी महिला लीना राघोर्ते व तिच्या साथीदारांनी त्यांना रस्त्यात अडवून काठ्या, दगड व लाथांनी अमानुष मारहाण केली. मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू हिसकावून घेतल्या. या घटनेचाही व्हिडीओ दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद आहे.
ज्यांनी न्याय द्यायचा, तेच झाले आरोपी-
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेनं उलट अॅड. शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ एफआयआरही दाखल केला. जबपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आलं नाही, तोपर्यंत अॅड. शर्मा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच करण्यात आलं.
कथित शिक्षिका, खाजगी शाळा आणि ब्लॅकमेलिंगचा गुंता-
तपासादरम्यान हे उघड झालं की लीना राघोर्ते एक बेकायदेशीर शाळा चालवत होती, जिथं ५० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात होतं. याआधी ती ब्युटी पार्लर चालवत होती. अॅड. शर्मा यांनी याआधीही तिच्या ब्लॅकमेलिंगविषयी तक्रार केली होती, आणि त्याचे ऑडिओ पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.
पोलीस यंत्रणेविषयी संशयाची सावली-
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
पोलिसांनी त्वरित कारवाई का केली नाही?
महिला आरोपीच्या तक्रारीवर इतकी तत्परता का दाखवण्यात आली?
काय या मागे राजकीय किंवा स्थानिक दबाव आहे?
हे प्रश्न आता केवळ वकिलांच्याच नव्हे, तर संपूर्ण नागपूरच्या जनतेच्या मनात उमटत आहेत.
गुन्हा नोंद – पण न्याय कुठे?
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा र. नं. 366/25 अंतर्गत नोंदवला आहे. मात्र, कायद्यावरचा हा हल्ला केवळ एक घटना नसून, तो समाजातील न्यायव्यवस्थेवरचा अविश्वास व्यक्त करणारा आक्रोश आहे.
हा हल्ला अॅड. शर्मा यांच्यावर नव्हे, तर संपूर्ण संविधान, न्यायप्रणाली आणि नागरिकांच्या अधिकारांवर आहे. या वेळी न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.