
मिर्झापूर -उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघात घडला असून या दुर्घटनेत किमान ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. दोन ट्रकांच्या जोरदार धडकेत मध्ये अडकलेल्या कारला आग लागल्याने हा भयंकर प्रकार घडला.
अपघाताची थरारक घटना-
प्राथमिक माहितीनुसार, मागून वेगात येणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास ड्रामडगंज घाटातील उतारावर ही दुर्घटना घडली. वेगात आलेल्या ट्रकने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोन ट्रकांच्या मध्ये एक कार चिरडली गेली आणि त्यानंतर तिला आग लागली. याशिवाय आणखी एक कारही आगीत सापडली.
मिर्झापूरच्या पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, “ब्रेक फेल झाल्याचा अंदाज असून ट्रकने सलग वाहनांना धडक दिली. यात कार ट्रकांच्या मध्ये अडकून पूर्णपणे जळून खाक झाली.”
तातडीची बचाव मोहीम-
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या वाहनांमधील लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असून प्रशासनाने आवश्यक कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे.
वाहनांची माहिती-
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातात सामील असलेले एक ट्रक बिहार राज्याच्या नोंदणीचे, तर दुसरे मध्य प्रदेशातील आहे. तसेच एक कार सोनभद्र जिल्ह्यातील, तर दुसरी मिर्झापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त-
या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.








