मनपात वसुंधरा दिवस उत्साहात : आयुक्तांनी दिली ‘हरीत शपथ’
नागपूर : पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणासाठी आपण आपल्या दैनंदिन कृती, सवयी बदलवून शकतो. घराततील कच-याचे विलगीकरण, कच-याचे योग्य विलगीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, प्लास्टीकचा योग्यरित्या वापर, जीवनपद्धतीतील बदल या छोट्याशा गोष्टीही पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त आहेत. या सर्व बाबींची जागृती होउन लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून आपण आपण आपली छोटी कृतीही पर्यावरण संवर्धनासाठी देऊ शकतो, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मनपा मुख्यायातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये जागतिक वसुंधरा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सर्वांना ‘हरीत शपथ’ दिली. याप्रसंगी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, मुख्य अभियंता श्री. प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे श्री. कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मनपाचे ब्रँड अम्बेसेडर आर.जे.राजन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ होणे आवश्यक आहे. शासन किंवा प्रशासन म्हणून यावर काहीही उपाययोजन केल्यास त्या जनसहभागाशिवाय शक्य नाही. नागरिकांनी आपल्या छोट्या छोट्या कृतीतून ही जनजागृती करणे आवश्यक आहे. आपली येणारी पिढी ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काहीही झाले तरी आपल्या कुटुंबाचा वापरा, येणारी पिढी सुरक्षित आणि संवर्धित असावी हा मानस असतो. मात्र हा वारसा त्यांच्याकडे सोपविताना पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य असल्याची भावना पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या पृथ्वीचे संरक्षण आणि संवर्धन ही एखाद्या ठराविक दिवसाची बाब नसून ही दैनंदिन कृती आहे. यासाठी आपले छोटेसे पाऊलही मोठ्या चळवळीचे स्वरूप घेउ शकते, असेही श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले.
पर्यावरण संरक्षण ही जबाबदारी नाही गरज : मा.श्री. चिन्मय गोतमारे
पर्यावरणाचे संरक्षण ही आता केवळ आपली जबाबदारी राहिलेली नसून ती आपली गरज झालेली आहे, असे प्रतिपादन नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे यांनी केले. वनस्पतीशास्त्र विषयाचे अभ्यासक असलेले श्री. चिन्मय गोतमारे पुढे बोलताना म्हणाले, पर्यावरण अथवा निसर्गाशिवाय आपण जगणे अशक्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण ही आता आपली जबाबदारी नाही तर गरज आहे. आज आपण आपल्या कुठल्याही वागणुकीतून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचे धडे देउ शकतो. आज या गोष्टींची समाजाला गरज आहे. प्लास्टिकचे वापर ही आपली सर्वात मोठी समस्या असली तरी त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आधी गादीखाली ठेवून प्लास्टिक पिशव्यांचा वारंवार वापर व्हायचा. मात्र आज ‘फार्स्ट फूड’च्या नावाखाली वापर होणा-या प्लास्टिकचा वापर अत्यंत जास्त आहे. प्लास्टिक हे आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असून याबद्दल पर्याय शोधण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या टिम लिड सुरभी जयस्वाल यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी वसुंधरा दिवसाचे महत्व अधोरेखित केले. १९७० साली पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुरू झालेला हा प्रवास आता मोठ्या चळवळीच्या स्वरूपात असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यावरण ही आपली जबाबदारी असून आपणास त्यासाठी आपले योगदान देण्याची गरज आहे. आजचे वाढते तापमान ही मोठी समस्या आहे. यासाठी प्रत्येकाने कार्बन उत्सर्जनाकडे लक्ष देण्याकडे त्यांनी लक्ष्या आकर्षित केले. पायी चालणे, सायकलचा वापर या छोट्याशा बाबी कार्बन उत्सर्जन कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यावर भर देणारे आहे, असेही सुरभी जयस्वाल म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार मानले.