बायोफ्यूएल जागृती व बुद्धीशिलतेवर परिसंवाद
नागपूर. इथेनॉलवर वाहने चालविण्यासाठी सोळा वर्षांपूर्वी काम सुरू केले. पेटंट केले व मागील सरकारकडे इथेनॉलवर वाहने चालविण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पाच वर्षापूर्वी सरकार बदलल्याने या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आज देशात इथेनॉल, जैवइंधननिर्मितीसाठी चांगले वातावरण असल्याचे संशोधक व ग्रीन क्रुड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी आज सांगितले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जैव इंधनाचे स्वप्नपूर्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतर्फे व्हीएनआयटीच्या भौतिकशास्त्र सभागृहात ‘जैव इंधन जनजागृती व बुद्धीशिलता’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी. एम. पडोळे, व्हीएनआयटी बीओजीचे चेअरमन विश्राम जामदार, आर्किटेक्ट अभिषेक देशपांडे सुद्धा उपस्थित होते, यांनी ” क्रूड ” संदर्भातील वैश्विक समीकरण मांडले व भारताची त्यातील अपेक्षित भूमिका स्पष्ट केलि. यावेळी फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे, व्हीएनआयटीतील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक सचिन मांडवगणे, फाउंडेशनचे सहसचिव अनिल मालवीय यांनीही इथेनॉलनिर्मिती, त्याची बाजारपेठ, शेतकऱ्यांना फायदा, आर्थिक स्वातंत्र्य यावर मत व्यक्त केले. डॉ. जांभेकर म्हणाले, तत्कालीन सरकारने इथेनॉलनिर्मितीसाठी मदत न केल्याने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज देशात 1 कोटी 3 लाख लिटर इथेनॉल तयार होते. परंतु यातील मोठ्या प्रमाणात मद्य निर्मितीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथेनॉलनिर्मिती वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी आलूपासून ते शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत शेतीतील कचऱ्यापासून इथेनॉल तयार होते. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आलू लावल्यास त्यापासून इथेनॉल निर्मिती होऊ शकते. देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी नवे प्रयोग करावे लागणार आहे. सरकारने नागपुरात संशोधन केंद्र सुरू करावे, यासाठी फाऊंडेशन काम करणार असल्याचे ते म्हणाले. देशात आलू, मकापासून किती इथेनॉल तयार करण्यात येत आहे तसेच भविष्यात त्यात कशी वाढ शक्य आहे, याबाबतचा डाटा फाऊंडेशन सरकारकडे मांडणार असल्याचे विश्राम जामदार यांनी सांगितले. अधिकृतरित्या 8 टक्के इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वापर होत असल्याने देशाचे कोट्यवधी रुपये वाचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. या दिशेने फाऊंडेशनचे पहिले पाऊल असल्याचे जामदार यांनी नमुद केले.
संशोधन केंद्र नागपुरात व्हावे, इंधना बाबत आपण सम्पूर्ण स्वावलम्बी झाल्याशिवाय १०० % आर्थिक स्वातन्त्रय नाही ! :
अजित पारसे
इथेनॉल व जैवइंधनात देशाला सक्षम करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे गेल्या काही वर्षात इथेनॉल, जैवइंधनाला देशात मान्यता मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नागपुरात या संदर्भातील मोठे संशोधन केंद्र झाल्यास विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, व्यावसायिकांना नवे आर्थिक दालन उघडे होणार आहे. इंधन आयातीबाबत आपला देश संपूर्ण स्वावलंबी झाल्याशिवाय आर्थिक स्वतंत्र मिळू शकणार नाही, यासाठी ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन प्रयत्न करणार असल्याचे सचिव अजित पारसे म्हणाले. शेतकरी वर्गाला थेट उद्योग जगताशी जोडणे व त्यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर, याबाबत त्यांनी फाऊंडेशनचे धोरण स्पष्ट केले.