Published On : Fri, Feb 2nd, 2018

ऊर्जा बचत ही काळाची गरज – अनिल सोले

Advertisement

नागपूर: पर्यावरण संवर्धन आणि येणा-या पिढीसाठी ऊर्जाबचत करणे गरजेचे आहे. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिनानिमित्त अनावश्यक दिवे बंद ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच शहरात विविध ठिकाणी पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येत असल्याने ऊर्जेची बचत होत असल्याची नोंद मनपा विद्युत विभागाकडे आहे. ऊर्जा बचतीच्या या यज्ञात प्रत्येकाची आहुती गरजेची असल्याचे मत आमदार व माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले.

पोर्णिमा दिनानिमित्त गरोबा मैदान दीघोरीकर चौक येथे नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पौर्णिमा दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती मनोज चापले, मनपातील विद्युत विभागाचे अजय मानकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.

परिसरातील प्रतिष्ठाने, चौकातील दिवे आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून पोर्णिमा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी सिग्नलवर उभ्या राहणा-या वाहन चालकांनाही या दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी सुरभी जैस्वाल, बिष्णू यादव, संजीवनी गोंदोडे, अभय पौनीकर, स्मिताली उके प्रामुख्याने उपस्थित होते.