Published On : Fri, Jul 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विमानाचे गया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; ‘हे’ कारण आले समोर

Advertisement

गया (बिहार) – देशात विमानसेवेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचं गुरुवारी आपत्कालीन लँडिंग करावं लागल्याची घटना घडली. गडकरी रांचीच्या नियोजित दौऱ्यावर होते, मात्र खराब हवामान आणि अत्यल्प दृश्यमानतेमुळे त्यांचं विमान मध्यंतरी वळवून बिहारच्या गया विमानतळावर उतरवण्यात आलं.

अचानक वातावरण बिघडलं, विमान वळवावं लागलं
झारखंड आणि बिहारमध्ये सध्या मान्सूनचा जोर असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी दुपारी नितीन गडकरी यांचं विमान रांचीच्या दिशेने जात असताना जोरदार पावसामुळे आणि ढगांच्या गर्दीमुळे दृश्यमानता कमी झाली. यामुळे वैमानिकांनी दक्षता म्हणून विमान रांचीऐवजी गया विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रशासन सतर्क; विशेष देखरेखीखाली लँडिंग
गया विमानतळ प्रशासनाला गडकरींच्या विमानाचं मार्गवळण झाल्याची माहिती अर्धा तास आधीच मिळाली होती. यामुळे तत्काळ सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. सुरक्षा यंत्रणांनी विमानतळ परिसरात बंदोबस्त वाढवला आणि व्हीआयपी प्रतीक्षालयात गडकरींसाठी विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली.

विशेष विमानाद्वारे रांचीला रवाना
हवामान थोडं स्थिर झाल्यानंतर रांचीहून एक विशेष विमान बोलावण्यात आलं. काही वेळ विश्रांतीनंतर गडकरी त्याच विशेष विमानानं आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या घटनेबाबत त्यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नसली तरी, गया विमानतळ प्रशासनाने प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये गडकरी विमानतळ परिसरात दिसून आले.

विमानसेवा पुन्हा चर्चेत
मागील काही दिवसांपासून देशात विमानसेवेशी संबंधित अनेक घटना घडत आहेत. अहमदाबाद विमानतळावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानं देश हादरला होता. त्यानंतर अनेक विमानांचे मार्ग बदलले गेले, काही सेवा रद्द करण्यात आल्या आणि तांत्रिक बिघाडांच्या घटनाही समोर आल्या.

गडकरींच्या विमानाच्या लँडिंगमुळे पुन्हा एकदा विमानसेवेतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि हवामानाशी जुळवून घेण्यासाठी प्रशासन कितपत सज्ज आहे, यावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Advertisement
Advertisement