
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता उंबरठ्यावर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तयारी सुरू केली असून, यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आयोगाने तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा आराखडा तयार केला आहे.
पहिला टप्पा : नगरपालिकांच्या निवडणुका (नोव्हेंबर-डिसेंबर)
दुसरा टप्पा : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (डिसेंबर अखेरपर्यंत)
तिसरा टप्पा : मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका (जानेवारीत)
नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याचा आयोगाचा मानस आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला या काळात नवीन घोषणा करता येणार नाहीत, केवळ विधेयकांवर निर्णय घेता येतील.
तथापि, आयोग अशा परिस्थितीत अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवण्याचाही विचार करत आहे. अधिवेशन संपताच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत.
राज्यातील नगरपालिकांपासून ते महापालिकांपर्यंतच्या निवडणुकांमुळे येत्या तीन महिन्यांत राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हं आहेत.









