Published On : Wed, Mar 27th, 2024

भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात फक्त त्यांच्याच नेत्यांचा विकास झाला; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Advertisement

नागपूर :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाचा वा शहराचा नव्हे तर भाजप नेत्यांचाच सर्वाधिक विकास झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. तसेच भाजपने सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली हे आता प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. देशातील जनताच आता भाजपची घरवापसी करणार असल्याचे ते म्हणाले.

नागपूर हे नेहमी काँग्रेसच्या विचारांचे शहर राहिले आहे. विचारांच्या लढाईत काँग्रेस महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा दावाही पटोले यांनी केला. केवळ शहरात सिमेंट रोड आणि उड्डाण पुले बांधली म्हणून नागपूरचा विकास झाला असे होत नाही. ज्या विकासाचे भाजपचे कार्यकर्ते गोडवे गात आहेत, त्यांचा स्वतःचा व नेत्यांचा किती आर्थिक विकास झाला हे त्यांनी आधी जाहीर करावे, असा घणाघातही पटोले यांनी केला.

नागपुरात गरज नसतानाही रस्ते तोडफोड करून खोदकाम सुरु केले जात आहे. नागपूरकरांना याचा नाहक त्रास होत असून अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.अनियोजित विकासामुळे पावसाळ्यात अर्धे नागपूर पाण्याखाली बुडाले होते.

त्यामुळे विकासावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही, असेही पटोले म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव दिला जात नाही.त्यामुळे जनतेनी भाजपला कशासाठी मतदान करावे, असा संतप्त सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.