Published On : Mon, Mar 27th, 2017

मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंची गायकवाडांना समज

Advertisement


मुंबई:
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया प्रकरणाबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी फक्त समज दिली आहे. मीडियाशी कोणताही संपर्क साधू नका, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी रवींद्र गायकवाड यांना दिली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतरही शिवसेना रवींद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं चित्र आहे.

उद्धव ठाकरेंनी गायकवाड यांना केवळ समज देऊन सोडलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी वर्तन चांगलं असावं अशी सूचना केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस तपास सुरु असेर्यंत पक्ष गायकवाड यांच्यावर सध्यातरी कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र या दिवसांत त्यांनी कुणाशीही संपर्क करू नये.

मागील आठवड्यातील संबंधित प्रकारावर उद्धव ठाकरेंनी रवींद्र गायकवाड यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. परंतु गायकवाड यांनी अजून लेखी स्वरुपात ते सादर केलं नाही. मात्र गायकवाड यांनी त्यांची बाजू पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं.

रवींद्र गायकवाड सचिव किंवा शाखाप्रमुख नाहीत, त्यामुळे त्यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगू शकत नाही. ते संसदेचे खासदार असून पक्षाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना पक्षातून निलंबित करु शकत नाही. सध्याच्या घडीला आम्ही फक्त त्यांना समज देऊ शकतो आणि वर्तनाकडे लक्ष देण्यास सांगू शकतो, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं.

दरम्यान रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवास नाकारणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे खासदार आज हक्कभंग आणण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार अशाप्रकार कोणत्याही प्रवाशाला तिकीट नाकारता येत नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. गायकवाड यांना दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तवणूक देऊन त्यांचे नाव एअर इंडिया व इतर विमान सेवा कंपनीद्वारे ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांना विमान प्रवास बंदी करण्यात आलीय. हे विमान कंपन्यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. गायकवाड यांच्यावर झालेल्या याच अन्यायाच्या निषेधार्थ लोहारा आणि उमरगा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.