
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन देशभर चर्चेचा विषय ठरत असताना नागपूरच्या सराफा व्यावसायिकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे चेअरमन तथा नागपूरमधील प्रख्यात सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेला समर्थन देत हे आवाहन देशहितासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
राजेश रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. त्यामुळे विदेशी चलनाचा मोठा हिस्सा देशाबाहेर जातो. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामागे देशाचे विदेशी चलन वाचवण्याचा आणि अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात सोने हे केवळ परंपरा किंवा दागिन्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणूनही लोक मोठ्या प्रमाणात सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे.”
सुवर्ण मुद्रीकरण योजना प्रभावी करण्याची गरज-
राजेश रोकडे यांनी केंद्र सरकारकडे सुवर्ण मुद्रीकरण योजना (Gold Monetisation Scheme) प्रभावीपणे राबवण्याची मागणीही केली. “देशातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने निष्क्रिय स्वरूपात पडून आहे. अंदाजे ३० ते ४० हजार टन सोने आर्थिक प्रवाहात आणता आले, तर सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, या योजनेमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेलाही बळ मिळू शकते. तसेच नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून बाजारात सोन्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाजार स्थिर आहे आणि सोने उपलब्ध आहे. सरकारचा उद्देश अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा आहे,” असे आवाहनही राजेश रोकडे यांनी केले.
दरम्यान, अर्थतज्ज्ञांच्या मते, जर नागरिकांनी सोन्याऐवजी बँका, एसआयपी, शेअर बाजार आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक वाढवली, तर देशांतर्गत भांडवल निर्मितीला मोठी चालना मिळू शकते.








