Published On : Mon, Mar 5th, 2018

माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, श्रीदेवीच्या सावत्र मुलीची विनंती

Advertisement

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर तिची सावत्र मुलं, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर धीराने कुटुंबासोबत राहिले. श्रीदेवीबद्दलचा तिरस्कार विसरुन हे दोघे प्रत्येक क्षण वडिलांसोबत उपस्थित होते. त्यांच्या या कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं.

पण याचवेळी सोशल मीडियावर अर्जुन आणि अंशुलाच्या चाहत्यांनी जान्हवी तसंच खुशी कपूर यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यामुळे नाराज झालेल्या अंशुला कपूरने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. माझ्या बहिणींवरील टीका बंद करा, अशा शब्दात तिने टीकाकांना सुनावलं.

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या एका फॅनने त्याच्या सावत्र बहिणींवर टीका केली होती. अर्जुनची सख्खी बहिण अंशुलाची नजर या कमेंटवर गेली आणि अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे ती नाराज झाली. गप्प न राहता, तिने इन्स्टाग्रावर या ट्रोलरला उत्तर दिलंच, पण त्याची कमेंटही हटवली.

तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही अशाप्रकारच्या अपमानजनक भाषेचा वापर करु नका, विशेषत: माझ्या बहिणींना. हे मला आवडत नाही. त्यामुळे मी तुमची कमेंट डिलीट केली आहे. माझ्या आणि अर्जुनबाबत असलेल्या तुमच्या प्रेमासाठी आभार मानते. फक्त एक गोष्ट सुधारायची आहे. मी भारताबाहेर कधीही काम केलेलं नाही. कृपया आनंद वाटा आणि चांगलं वातावरण कायम ठेवा. प्रेमासाठी आभार.’