
नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित प्रतिष्ठित ‘अॅट होम’ कार्यक्रमात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे भव्य सादरीकरण केले. १५ ते १७ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यक्रमात विविध लोकनृत्य, लोकवाद्ये आणि पारंपरिक कलाप्रकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक सादरीकरणाची संकल्पना साकारण्यात आली. नागपूरच्या या सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून चारही राज्यांच्या वैविध्यपूर्ण लोकपरंपरांना राष्ट्रपती भवनाच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर स्थान मिळाले.
महाराष्ट्रातील लावणी, कोळी नृत्य, लेझिम, झांझ, धनगरी गजा, तुतारी, ढोल-ताशा, दशावतार आणि सोंगी मुखवटे सादर करण्यात आले. मध्यप्रदेशातील भगोरिया, गणगौर, बैगा कर्मा आणि बधाई नृत्य, छत्तीसगडमधील मुरिया, गेड़ी, गौर मारिया आणि कक्सार नृत्य, तर गोव्यातील समई नृत्य, घुमट आणि घोडे मोडणी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.
या सादरीकरणासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी पारंपरिक सजावट करण्यात आली होती. रांगोळी, आकाशकंदील, केळीच्या पानांपासून तयार केलेले प्रवेशद्वार तसेच खजूर आणि नारळाच्या पानांपासून उभारण्यात आलेल्या पारंपरिक सजावटीने राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमस्थळाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्रातील एकूण १२० कलाकारांनी सहभाग घेतला. विविध लोककला, लोकनृत्य आणि लोकवाद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह चारही राज्यांच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले.
सादरीकरणाची संकल्पना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांची होती. संगीत संयोजन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक अश्विन दळवी यांनी केले, तर नृत्य दिग्दर्शन मैत्री बापट यांनी केले.
नागपूरस्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने या माध्यमातून विदर्भासह दक्षिण मध्य क्षेत्राच्या लोकपरंपरा आणि कलावैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केले. राष्ट्रपती भवनासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा यांच्या सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण होणे, ही नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठीही उल्लेखनीय बाब ठरली.




