मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, मागील २४ तासांत कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ४,०२६ वर पोहोचली असून केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये नव्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
महाराष्ट्रात वाढती चिंता-
महाराष्ट्रात सोमवारी ५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी २० रुग्ण मुंबईत आढळले. सध्या राज्यात ८७३ सक्रिय रुग्ण असून, यापैकी ४८३ रुग्ण केवळ मुंबईतील आहेत. मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या ३६९ वर पोहोचली असली तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क आहे. कोल्हापूर आणि सातारा येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूंचा आकडा १० वर गेला आहे.
नवीन उपप्रकारामुळे वाढ-
कोरोनाच्या NB.1.8.1 या नव्या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) स्पष्ट केले आहे. हा उपप्रकार ओमिक्रॉनशी संबंधित असून, झपाट्याने फैलावणारा आहे. लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, नाक वाहणे आणि भूक मंदावणे यांचा समावेश आहे. ही लक्षणे सामान्य सर्दी किंवा हंगामी तापासारखीच असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आरोग्य मंत्रालयाचे आवाहन आहे.
दरम्यान कोरोनाच्या नव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार घ्यावेत, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.