Published On : Thu, Apr 30th, 2015

राज्याच्या विकासपर्वात नागरिकांनीही सहयोग द्यावा : मुख्यमंत्री

Advertisement

Fadanvis
मुंबई। आमच्या सरकारकडून राज्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे निर्णय घेतले गेले आहेत, या निर्णयांमुळे राज्यात विकासाचे नवेपर्व सुरू होत आहे. त्यासाठी नागरिकांनीही आपला सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्तराज्यातील नागरिकांना दिलेल्याशुभेच्छापरसंदेशात त्यांनी हे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्रासारख्या एक अग्रणी आणि विकसनशील राज्यामध्ये शेतीची समस्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही लाजिरवाणी बाब आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाश्वत शेती होणे गरजेचे आहे. राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीचे वास्तव बदलण्यासाठी जलयुक्त शिवार योजना हाती घेण्यात आली आहे. प्रामुख्यानेजलसंधारणाच्या कामासाठी जलस्वयंपूर्ण गावांची संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी लोकसहभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा हजार गावांत या योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. दरवर्षी पाच हजार गावे जलयुक्त करून दुष्काळमुक्तीकडे राज्याने वाटचाल सुरू केली आहे.

राज्यातील 53 टक्के जनता 25 वर्ष वयोगटाखालीलआहे. या युवकांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार गरजेचा आहे. त्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियान राबवून उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक आणावी लागणार आहे. यातून युवकांना रोजगार मिळू शकेल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणतात, राज्याने टोलमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हलक्या वाहनांना काही ठिकाणी पथकरातूनसूट देण्यात येत आहे. महाराष्ट्राचा मानबिंदूअसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई आणि लंडनमधील स्मारक पूर्णत्वास नेण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही महत्त्वपूर्ण आहे. गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी, गुन्हेसिद्धतेचे प्रमाण वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबतीतलेआठ टक्क्यांपर्यंत खाली गेलेले प्रमाण गेल्या सहा महिन्यांत 28 वरून 38 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

जनतेच्या दैनंदिनजीवनाशी निगडीत प्रश्नांनाविशेषत्वाने प्राधान्य देण्यात येत आहे अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा निश्चित कालावधीत मिळाव्यात यासाठी लोकसेवा हक्क कायदा लागू करण्यात येत आहे. या माध्यमातून एक वेगळे प्रशासन राबविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा निधी पोहोचावा यासाठी सकारात्मक दिशेने शासन प्रयत्नशीलआहे. विकास आराखडे, शेती आणि पाण्याचे नियोजन करून राज्य सकारात्मकतेने पुढे जात आहे. राज्य शासनाने निर्णयक्षमता दाखविली आहे, यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहयोगाची गरज आहे.प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीकेले आहे.