Published On : Fri, Nov 13th, 2020

सुरक्षा बाळगून साजरी करा पर्यावरणपूरक “ग्रीन” दिवाळी

Advertisement

– मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन : आगीच्या घटना घडल्यास १०१वर संपर्क साधा

नागपूर : दिवाळी साजरी करताना सुरक्षेची विशेष काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. या आनंदाच्या उत्सवात कुठल्याही प्रकारची दुर्घटना होउ नये यासाठी मनपाची अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे. मात्र नागरिक म्हणून आपण सर्वांनीच काळजी घेउन उत्सव साजरा करावा. एकीकडे कोव्हिडच्या संसर्गाची भीती आहे तर दुसरीकडे फटाक्यांमुळे होणारा धूर, त्यामुळे उद्भवणारे आजार आणि वाढत्या आगीच्या घटना ही चिंतेची बाब आहे. म्हणून फटाके टाळून पर्यावरणपूरक “ग्रीन” दिवाळी साजरी करावी. तसेही मनपाने मोठया फटाके फोडण्यावर बंदी घातलेली आहे. कोव्हिडच्या काळात सर्वच नागरिकांनी सामंजसपणे नियमांचे पालन केले. ही दिवाळीही सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करूनच साजरी केली जावी. प्रत्येकाने स्वत:ची आणि त्यासह इतरांचीही सुरक्षा बाळगून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जनतेला केले आहे.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना होउ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आग संबंधी दुर्घटना घडल्यास नागपूर महानगरपालिकेद्वारे १०१ हा टोल फ्री क्रमांक सुविधेमध्ये आहे. मनपाच्या अग्निशम विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे. नागपूर शहरात मागील दोन वर्षात फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना अगदी कमी आहेत. नागरिकांचा समंजसपणा, सुज्ञपणा आणि खबरदारीमुळे या घटना टाळता आल्या आहेत. यावर्षीही प्रत्येकाने अशीच खबरदारी घ्यावी. मागील वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यामुळे केवळ १ आगीची घटना घडली. त्यापूर्वी २०१८मध्ये २ घटना घडल्या आहेत. ही संख्या शून्यावर येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासह इतर सर्व धूर करणारे फटाके टाळावे. फटाक्यांच्या धूरामुळे प्रदूषण होतो शिवाय त्याचा फुफ्फुसावरही विपरीत परिणाम पडतो. कोव्हिडच्या या संकटात फुफ्फुसांचे आरोग्य जपने आवश्यक आहे. त्यामुळे फटाके टाळून पर्यावरणपूरक ‘ग्रीन दिवाळी’ साजरी करावी, असेही आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

ही काळजी घ्या

– घरी किंवा घराजवळच्या परिसरात भंगार किंवा अन्य ज्वलनशील वस्तू ठेवू नका

– अर्धपेटलेले फटाके पुन्हा जाळू नये

– दिवे, अगरबत्ती किंवा मेणबत्ती जवळ फटाके ठेवू नये

– श्शक्यतो मोठे फटाके फोडू नये

– गवत काड्यांपासून बनलेले घर, गवताचे किंवा कचऱ्याच्या ढिगाराजवळ रॅकेट तथा अन्य उडणारी फटाके जाळू नये

– फटाके जाळताना जवळ एक बादली पाणी आणि एक बादली रेती अवश्य ठेवा

– फटाके उडविताना घराची दारे खिडक्या बंद ठेवा

– फटाके जाळताना सूती कपडे वापरा

– लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा

– शरीरावर जळण्याची दुर्घटना घडल्यास जळलेल्या भागावर वेदना कमी होईपर्यंत थंड पाणी टाका व नंतर डॉक्टरांकडे जा

– आवश्यकता भासल्या १०१ या क्रमांकावर फोन करा किंवा आपल्या जवळच्या अग्निशमन केंद्रात माहिती द्या