मुंबई: महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चेला उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून दोघे एकत्र यावेत अशी मागणी होत असताना, अलीकडे राज ठाकरे यांनी युतीसाठी openness दर्शवली. त्यामुळे ही शक्यता अधिकच चर्चेत आली आहे.
मात्र, भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “भाजपाचा पूर इतका जोरात आहे की, त्यात कोणीही वाहून जाईल. राज आणि उद्धव ठाकरेही त्याला अपवाद नाहीत,” असं ते म्हणाले.
राणे पुढे म्हणाले, “कोणी कुणाबरोबर युती केली, तरी भाजपाचा प्रभाव एवढा प्रबळ आहे की तो सगळ्यांना गिळंकृत करेल. हा पूर त्रासदायक नाही, तर जनतेसाठी फायदेशीर आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्य, दोन्हीकडे सत्ता आहे आणि सरकार जनहितासाठी काम करत आहे.”
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे काय बोलणार? अडीच वर्षांच्या अपमानाची हकिगत सांगणार का? की 26 वर्षांच्या भ्रष्टाचाराचा हिशेब देणार? कोरोनाच्या काळात औषधांतील गोंधळ स्पष्ट करणार?”
“राज आणि उद्धव एकत्र आले तरी काय वेगळं होणार आहे? काही चमत्कार होणार आहे का? वीज चमकणार की सगळं मत एकाच बाजूला झुकणार? त्यांच्याकडे आहे तरी काय?” असा सवाल करत राणेंनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला थेट आव्हान दिलं.