Published On : Tue, May 26th, 2020

12 हजार कोटींची अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चार धाम परियोजना’ चंबा बोगद्याचा गडकरींच्या हस्ते शुभारंभ

Advertisement

केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री बारमाही जोडले जाणार

नागपूर/दिल्ली : केंद्र शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अत्यंत प्रतिष्ठेची योजना असलेल्या चार धाम परियोजनेअंतर्गत आज अत्यंत कठीण अशा चंबा बोगद्याचा शुभारंभ केंद्रीय महामार्ग, परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शुभारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) या मिलिटरीतील संस्थेने हे काम विक्रमी वेळात पूर्ण केले आहे. चंबा बोगदा हा ऋषिकेश धारासू गंगोत्री या राष्ट्रीय महामार्गावर 440 मीटर लांब यशस्वीपणे खोदण्यात आला असून या बोगद्याचे काम आता पूर्ण झाले आहे. या शुभारंभ प्रसंगी बीआरओच्या सर्व कर्मचार्‍यांचे, कंत्राटदारांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले- उत्तराखंड येथे यापूर्वी नैसर्गिक आपत्ती आली असताना अनेक जणांचे मृत्यू झाले. त्याचवेळी केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री हा बारामाही रस्ता तयार करण्याचा संकल्प आपण केला होता. बाराही महिने हा रस्ता सुरु राहणार आहे. ऋषिकेश धरासू गंगोत्री मार्गावर 86 कोटींचा चंबा हा बोगदा तयार करण्यात आला आहे. चंबा या गावाच्या खालून राष्ट्रीय महामार्ग 94 वर हा बोगदा करण्यात आला आहे.

तसेच मानसरोवराचा रस्ताही अत्यंत कठीण आहे. तेथेही बीआरओ चांगले काम करीत आहे. मानसरोवराला कारमध्ये बसून जाण्याचे आपले स्वप्न आहे, असल्याचे सांगून गडकरी म्हणाले- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या राष्ट्रीय मार्ग 94 मुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. तेथे पर्यटकांना मिळणार्‍या सोयीसुविधा या जागतिक दर्जाच्या मिळाव्या याकडे उत्तराखंड शासनाने लक्ष द्यावे.

या कामासाठी उत्तराखंड सरकारचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे. 251 किमीचा केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हा जानेवारी 2021 मध्ये पूर्ण होणारा रस्ता आता ऑक्टोबर 2020 पर्यंतच पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे चंबा गावात होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार असून वेळेची बचत होणार आहे.

या रस्त्याचे काम करताना भूसंपादनाच्या समस्या, पाण्याची समस्या, हलकी जमीन, पाणी झिरपण्याची समस्या, लॉकडाऊन अशा अनेक समस्यांचा बीआरओंना सामना करावा लागला. ज्या एक किलोमीटरसाठी अर्धा तास लागायचा ते अंतर आता 10 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. जानेवारी 2019 मध्ये बीआरओने बोगद्याचे काम सुरु केले होते. दिवसरात्र काम सुरु करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. अत्याधुनिक ऑस्ट्रीयन तंत्रज्ञानाने या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. बारा हजार कोटींच्या या प्रकल्पात बीआरओ 251 किमीचे काम करीत आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत बीआरओ 4 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचेही गडकरी म्हणाले.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यास बीआरओने सल्लागाराची नियुक्ती करून प्रकल्प तयार करावा. यामुळे या रस्त्यावरील पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होईल,असेही गडकरी म्हणाले. शेवटी संपूर्ण बीआरओ चमूचे आणि कंत्राटदारांचे त्यांनी अभिनंदन केले.