Published On : Wed, May 1st, 2019

भाजप सरकार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात अपयशी!: अशोक चव्हाण

शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्या.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा.

Ashok Chavan

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्लाचा तीव्र शब्दात निषेध करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ भूमिकेचाच हा परिणाम असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.

Advertisement

खा. चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रातील मोदी सरकार असो वा राज्यातील फडणवीस सरकार, दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या सरकारच्या काळात देशात अतिरेकी व नक्षलवाद्यांचे हल्ले वाढले. पण भाजपाला त्याचे काहीही पडलेले नाही. फक्त प्रचारसभेतच घरात घुसुन मारण्याच्या फुशारक्या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत. नोटाबंदीने नक्षलवाद व दहशवादाचा बिमोड होणार असल्याचा दावाही यांनीच केला होता, पण त्याचाही काही परिणाम झालेला दिसत नाही. भाजप सरकारची दहशतवादाविरोधात काही ठोस भूमिका नाही. त्यामुळेच या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे व नक्षलवाद्यांचे मनोधौर्य वाढले आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली.

गडचिरोलीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात काँग्रेस पक्ष सहभागी असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement