भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष : नितीन गडकरी

Advertisement

रामटेकचा पुढचा खासदार भाजपाचाच : फडणवीस
भाजपा जिल्हा व शहर कार्यकर्त्यांचा मेळावा

नागपूर: भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाचे मालक कार्यकर्ते आहेत. आजही आपला पक्ष शक्तिशालीच आहे. त्यामुळे लहानशा पराभवाने खचून जाण्याची गरज नाही. आमचा कोणताच पराभव झाला नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग, सडक परिवहन व लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी भाजपाच्या नवीन शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षांची घोषणा निवडणूक अधिकारी अतुल देशकर यांनी केली.

भाजपाचे शहर अध्यक्ष म्हणून पुन्हा प्रवीण दटके यांची तर जिल्हाध्यक्ष म्हणून अरविंद गजभिये यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे अतुल देशकर यांनी जाहीर केले. गीता मंदिराच्या सभागृहात भाजपा शहर व जिल्ह्याच्या वतीने आयोजित मेळाव्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. समीर मेघे, डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आ. रामदास आंबटकर, आ. कृष्णा खोपडे, माजी आ. सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, निवडणूक प्रमुख अतुल देशकर आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीलाच दोन्ही अध्यक्षांच्या कामांचे कौतुक करून दटके-डॉ. पोतदार यांच्या काळात संघटनेचे काम वाढीस लागल्याचे सांगितले. विधानसभा, जिल्हा परिषदेत आपल्याला अपेक्षित यश मिळाले आहे. पण तेवढ्या अपयशाने खचून जाण्याची गरज नाही. समविचारी पक्षाने आपला विश्वासघात केला म्हणून सरकार बसू शकले नाही. असे असले तरी पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. पूर्ण ताकदीने पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. आमचा पक्ष लोकशाहीवादी आहे, विचारांची कट्टरता आहे, असे सांगून पक्षाचा अधिक विस्तार करायचा आहे, असेही ते म्हणाले.

पुढचा रामटेकचा खासदार भाजपाचाच : देवेंद्र फडणवीस
कुणाला असेल वाटत असेल की भाजपाची ताकद कमी झाली. पण या गैरसमजात राहू नका. एख़ाद्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपाची ताकद कमी होणार नाही. जि.प.च्या पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. रामटेक लोकसभेचा पुढील खासदार हा भाजपाचाच असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

एका काळात प्रचंड संघर्ष करूनही यश मिळत नसेल पण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गडकरींनी नेतृत्व दिले त्यामुळे आज शहर आणि जिल्ह्यात पक्ष मजबूत उभा झाला आहे. पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू पण पुन्हा मजबुतीने उभे राहू. 2022 मध्ये येणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीत नितीन गडकरींच्या नेतृत्वात मनपावर पुन्हा भाजपाचाच झेंडा फडकवू, असेही ते म्हणाले.

आज देशात काही राजकीय पक्ष आपल्याविरूध्द जातीयतेचा खोटा प्रचार करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहे, हा अपप्रचार संपवून आपली कामे लोकांना सांगायची आहेत. नवीन ÷अध्यक्षांच्या नेतृत्वात समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचे काम आम्ही करणार आहोत. जनतेच्या हिताच्या गोष्टी करण्यास या सरकारला बाध्य करू. या सरकारला कामे करायची नाहीत, तर थांबवायची आहे. प्रगतीची गंती मंदावली आहे. विरोधी पक्षाची भूमिकाही आम्ही पूर्ण ताकदीने व सक्षमपणे पार पाडणार आहोत, असे सांगत फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवरही टीकेचे प्रहार केले.

प्रचंड ताकदीने संघटन उभारू : बावनकुळे
पूर्वीपेक्षाही अधिक काम दटके-डॉ. पोतदार यांनी आपल्या काळात केले असल्याचे सांगून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा प्रचंड ताकदीने संघटन उभारू असे सांगितले. सत्ता आणि संघटना यांचा समन्वय दोन्ही अध्यक्षांनी साधला असल्याचे सांगून ते म्हणाले- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच या जिल्ह्याला आणि शहराला हजारो कोटी रुपये मिळाले आहेत. 15 वर्षात ज्यांनी विकास केला नाही ते आज आता काय विकास करणार? भारनियमन, वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले.

किशोर रेवतकर यांनी जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याची माहिती दिली तर प्रवीण दटके यांनी आपल्या काळात संघटनेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. राजीव पोतदार, प्रवीण दटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवे अध्यक्ष अरविंद गजभिये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भोजराज डुंबे यांनी केले.