नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथील जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला.
भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २००५ सालच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शाहांना दोषमुक्त केले होते. त्याचदरम्यान अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री होते.
त्याच्या चार वर्षांनी राहुल गांधी बंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाहांवर एक विधान केले होते. हेच विधान मानहानीकारक असल्याचा दावा मिश्रा यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी बोलतांना राहुल गांधी यांचे वकील संतोष पांडे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. राहुल गांधी हे निरापराध असून, त्यांनी मानहानीकारक विधान केलेले नाही, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत त्यांचा गुन्हा हा जामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे पांडे म्हणाले.