नागपूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल करण्यात आला असून तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींना मोठा आर्थिक धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना सुरू असून लाखो महिलांना याचा लाभ मिळत आहे.
मात्र, तपासणीदरम्यान अनेक अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. काही ठिकाणी सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनीही या योजनेतून पैसे घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे सरकारने नियम कडक करत केवायसी (KYC) पडताळणी अनिवार्य केली.
सरकारने केवायसीसाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. शेवटची मुदत 30 एप्रिल रोजी संपली. त्यानंतर करण्यात आलेल्या छाननीत मोठा निर्णय घेत 54 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं.
एक कोटी 89 लाख महिला अजूनही पात्र-
दरम्यान, या छाननीनंतरही राज्यातील सुमारे 1 कोटी 89 लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे.
का ठरल्या महिला अपात्र?
केवायसी न केल्यामुळे
उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे
सरकारी नोकरीत असल्यामुळे
योजनेच्या अटींची पूर्तता न केल्यामुळे
काय कराल? तुमचं नाव तपासा
ज्या महिलांना आपली स्थिती तपासायची आहे, त्यांनी:
अधिकृत पोर्टलवर जाऊन यादी तपासावी
किंवा जवळच्या सेवा केंद्रात संपर्क साधावा
सरकारच्या या निर्णयामुळे पात्र महिलांना लाभ देण्यावर भर दिला जात असला, तरी मोठ्या संख्येने महिलांना योजनेबाहेर काढल्यामुळे राज्यात चर्चा रंगली आहे.









