Published On : Thu, Oct 24th, 2019

नागपुरकरांनो फटाके उडविताना सावधान!

Advertisement

सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे अग्निशमन विभागाचे आवाहन

नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतिही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन मनपाच्या अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळी हा आनंद आणि चैतन्याचा सण असून आहे. मात्र या सणात घडणा-या आगीच्या घटना, फटक्यांमुळे होणा-या दुर्घटनाही जास्त असतात. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाची फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रदुषण विरहीत दिवाळी साजरी करून आनंद द्वीगुणीत करा : आयुक्त
२००९ ते २०१८ या दहा वर्षामध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्याची नोंद मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आहे. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदुषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्वीगुणीत करावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

आपात्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर साधा संपर्क
दिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणा-या दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. दिवाळीदरम्यान घडणा-या घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपात्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी 0712-2567777, 0712-2567101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेह-यावर कायम राहावा व हा आनंद इतरांच्या चेह-यांवरही खेळत राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्य करीत आहे.

२००९ ते २०१८ या कालावधीत फटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटना
२००९ ते २०१८ या १० वर्षामध्ये शहरातील विविध ठिकाणी ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यामुळे सर्वाधिक आगीच्या घटना २०१२ या वर्षी घडल्या आहेत. तर २०१० या वर्षात एकही आगीची घटना घडली नाही.