Published On : Mon, Mar 15th, 2021

बंगाल आजही गरिबी, उपासमारीने त्रस्त : ना. गडकरी

Advertisement

एगरा मतदार संघात जाहीर सभा

नागपूर: पश्चिम बंगालमधील जनतेने आजपर्यंत काँग्रेस, सीपीएम आणि तृणमूल काँग्रेस या तीनही पक्षांना बंगालच्या विकासाची संधी दिली. पण हे तीनही पक्ष विकास करू शकले नाही. आणि जनतेच्या अपेक्षाही पूर्ण करू शकले नाही. म्हणूनच बंगालची जनता आजही गरिबी, भूकमरी व बेरोजगारीने त्रस्त असल्याचे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पं. बंगालमधील एगरा या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. ना. गडकरी यावेळी बोलताना म्हणाले- प. बंगालचा विकास करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा शासनाने केला. पण तृणमूलच्या राज्य शासनाने मात्र सहकार्य केले नाही. त्यांनी बंगालचा विकास होऊ दिला नाही. प. बंगालमध्ये येणारे विकास कामांचे मोठमोठे प्रकल्प राज्य शासनाने हाणून पाडले. परिणामी बंगालमध्ये गरिबी, उपासमार आणि बेरोजगारीने कहर केला.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार आहे. यावेळी बंगालमध्ये भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा आणि बंगालचा सर्वांगीण विकास साधून घ्या. आजपर्यंत झाला नाही, त्यापेक्षा जास्त विकास भाजपाचे शासन आल्यानंतर करू, असे आश्वासनही ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

https://www.facebook.com/watch/?v=1836556173188168

बंगालमध्ये आम्ही नवीन महामार्ग बांधले, जलमार्ग बांधले. यामुळे बंगालच्या व्यापार आणि उद्योगांच्या विकासाला गती मिळाली. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर बंगालमध्ये 1 लाख कोटींचे महामार्ग बांधू असे आश्वासन देऊन ना. गडकरी यांनी आवाहन केले की, भ्रष्टाचार करणार्‍यांचे, विकासाला विरोध करणार्‍यांचे राज्य बदला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. या सभेला मोठ्या संख्येने जनतेने हजेरी लावली.