Published On : Wed, Mar 28th, 2018

शिक्षक भरतीबाबतचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करा – धनंजय मुंडे

Advertisement

Dhananjay Munde
मुंबई: राज्यात २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही गेल्या 8 वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामध्ये ४ वेळा पात्रता ( TET) तर एक वेळा अभियोग्यता चाचणी ( TAIT) घेण्यात आली. या परिक्षा फक्त घेण्यात आल्या मात्र भरतीबाबत सरकारकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षक भरती बाबतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

या राज्यात फार मोठी बेरोजगारी वाढली आहे. साडेतीन वर्षात तर फार मोठया बेरोजगारीने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात बेरोजगारांचे अनेक ठिकाणी मोर्चेही निघत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेमार्फतही मोर्चे काढले जात आहेत.

राज्यातील एकूण जी पदे आहेत त्यापैकी १ लाख ७७ हजार पदे आज रिक्त आहेत. यामध्ये पोलिस भरती संदर्भात सन २०१४ पर्यंत दरवर्षी १५ हजार पदे भरली जात असताना सन २०१५ मध्ये ६ हजार ४३० पदे,सन २०१६ मध्ये ६ हजार ३९२ पदे एवढी पोलिस भरती होत आहे. स्वर्गीय आबा गृहमंत्री होते त्यावेळी दरवर्षी १५ हजार पदांची भरती होत होती. या राज्यात पोलिसांची गरज आहे तर मग पोलिस भरतीमध्ये ६ हजाराच्या आसपास भरती का करते. सरकारला बेरोजगारी वाढवायची आहे का, बेरोजगारीबाबत सरकारचे काय धोरण आहे हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

कित्येक वर्ष तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कंत्राटी कामगार आहेत. त्यांची मागणी होती की नियमित सेवेत घ्यावे. कंत्राटी म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाइतकेच काम करत असून तर त्यांना कायम सेवेत घ्यावे.

राज्याच्या कल्याणकारी संकल्पनेमध्ये राज्यातील शेवटचा तरुण जीवनातील स्थैर्याचा प्रश्न सुटेपर्यंत वेगळी कुठलीही भूमिका सरकारला घेता येणार नाही. राज्यातील जनतेला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी उपलब्ध करुन देण्याऐवजी स्वत:च्या फायदयाच्या कशा होतील असा प्रयत्न होत आहे.

शासनाने राज्यातील अनेक विभागातील भरत्या थांबवल्या आहेत.मध्येच एमपीएसीचा घोटाळा समोर आला.याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी राज्यातील बेरोजगारीवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि बेरोजगारी मुक्त राज्य करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली.