
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात तीव्र शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजचा दिवस शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केला असून, तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले. “आज मी एक दमदार, दिलदार आणि जिव्हाळ्याचा मित्र गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. अतिशय अनाकलनीय परिस्थितीत विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार हे महाराष्ट्रातील जनतेशी घट्ट नाळ असलेले लोकनेते होते. राज्याच्या कानाकोपऱ्याची माहिती, सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आणि विश्वास होता, असे फडणवीस म्हणाले.
संघर्षशील नेतृत्व, कठीण परिस्थितीतही न डगमगता पुढे जाण्याची वृत्ती आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व ही अजित पवार यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, अशा निर्णायक टप्प्यावर त्यांचे अचानक जाणे हे राज्यासाठी मोठी हानी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
“अशा प्रकारचे नेतृत्व घडायला अनेक वर्षे लागतात. त्यांच्या निधनाने मनाला चटका लावणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.








