
बारामती : राज्याच्या राजकारणात धक्कातंत्र, निर्णयक्षमता आणि थेट शैलीसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. वक्तशीर, कडक भाषाशैलीतही मिश्कीलपणा जपणारा ‘दादा माणूस’ काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय नेते, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लाडक्या दादां’ना अखेरचा निरोप दिला.
महाराष्ट्राचे लाडके दादा अनंतात विलीन
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यविधींना सुरुवात होताच शोकाकुल वातावरणात हजारो डोळे पाणावले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते अंत्यसंस्कार पार पडले. देशभरातून आलेल्या मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
राज्याच्या विकासात्मक राजकारणात ठसा उमटवणाऱ्या, निर्णयांमध्ये ठामपणा राखणाऱ्या आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणाऱ्या नेत्याचा असा अचानक अस्त झाल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचा वारसा आणि आठवणी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम जिवंत राहतील, अशा भावना अंत्यसंस्कारावेळी व्यक्त होत होत्या.








