Published On : Fri, Jan 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

ग्रुपमधील समाजविघातक संदेशांनाही लागणार चाप : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

ॲडमिनला मिळणार विशेष अधिकार. अफवा, अश्लिल मेसेजेसवर येणार बंधने.

नागपूर: व्हॉट्स ग्रुपमध्ये एखाद्याने समाजविघातक, समाजात दुफळी निर्माण करणारे मॅसेज टाकल्यामुळे अनेकदा ग्रुप ॲडमिनसाठी डोकेदुखी ठरली आहे. ग्रुप ॲडमिनला संबंधित व्यक्तिला ग्रुपमधून काढण्याचा अधिकार आहे. परंतु अनेकदा संबंधित व्यक्ति मित्र, नातेवाईक असल्यास ॲडमिनची कोंडी होत असते. परंतु आता ग्रुप ॲडमिनला विशेष अधिकार मिळणार असून अफवा पसरविणारा, समाजात तेढ निर्माण करणारा तसेच अश्लिल मेसेज हटविता येणार आहे.

सोशल मिडियाचा प्रत्येकच जण वापर करीत असून व्हॉट्स ॲप चॅट आता प्रत्येकाच्याच अंगवळणी पडले आहे. अगदी दहा वर्षांच्या मुलापासून तर सत्तर-अंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकही व्हॉट्‍स ॲप मेसेजिंगमधूनच एकमेकांशी संवाद साधत आहे. अनेकांनी कुटुंबातील सदस्यांचा, मित्राचा ग्रुप तयार केला. अनेक ग्रुपमध्ये, विशेषतः मित्रांच्या ग्रुपमध्ये, सामाजिक ग्रुपमध्ये समाजात दुफळी निर्माण करणारे, धर्माबाबत भावना दुखावणारे, चिथावणी देणारे तसेच अश्लिल संदेशही टाकले जाते. त्यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघत असून अशांतता पसरविण्याचेही मनसुबेही पुढे येत आहे. अशा व्यक्तिला ग्रुपमधून काढून टाकण्याचा अधिकार ॲडमिनला यापूर्वीच देण्यात आला आहे. ग्रुपमधून काढल्यामुळे भांडणे, वादही होतात.

आता अशा व्यक्तिला ग्रुपमधून काढून वादाची जोखीमही ॲडमिनला घ्यावी लागणार नाही. आता व्हॉट्‍सॲपने ग्रुप ॲडमिनला मेसेज डिलिट करण्याचा लवकरच अधिकार मिळणार असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. याबाबत ‘व्हॉट्सॲपबेटाइन्फो’ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ग्रुप ॲडमिनला आता ग्रुपमधील कोणतेही संदेश हटविण्याचा अधिकार मिळणार आहे.

त्यामुळे समाजात दुफळी निर्माण करणारे, समाजविघातक संदेश, धार्मिक भावना भडकविणारे संदेश नष्ट करता येईल. परिणामी संदेशामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रदूषणाला आळा बसणार असल्याचे पारसे म्हणाले. याशिवाय सद्यस्थितीत मॅसेज टाकल्यानंतर एक तास आठ मिनिटांमध्ये नष्ट करता येते. परंतु ही मर्यादा ७ ते ८ दिवसांपर्यंत करण्याबाबतही विचार करीत आहे. त्यामुळे समाजाला घातक मॅसेजची उपरती झाल्यास ग्रुप ॲडमिनला तो सात दिवसांत हटविता येणार आहे.

हे एक चांगले पाऊल आहे. यमुळे अफवा, फेक न्यूज पसरविण्यास आळा बसणार असून सामाजिक वातावरण स्वच्छ होईल. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांचे ग्रुप आहे. ग्रुपमध्ये कुणीही समाजविघातक संदेश टाकू नये, याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. अशावेळी त्यांना एखादी व्यक्ती नियुक्त करावी लागेल. परिणामी यातून रोजगाराचीही संधी नाकारता येत नाही.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com