Published On : Tue, Mar 21st, 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना आता आधार क्रमांक अनिवार्य

Advertisement


मुंबई:
खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना व हवामानाधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. या योजनांसाठी आधार क्रमांक संलग्न केलेल्या बँक खात्याच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी जलद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून खात्यावर थेट जमा करणे सुलभ होणार आहे.

राज्यात खरीप 2016 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 08 फेब्रुवारी, 2017 च्या राजपत्रान्वये खरीप हंगाम 2017 पासून या योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

खरीप 2017 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले छायाचित्र असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार क्रमांकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिटकार्ड, नरेगा जॉबकार्ड, वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.त्याचप्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावे लागणार आहे. यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित नजिकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

बँक खात्याशी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आदी जोडण्यामुळे बँक खात्याशी संलग्न पीक विम्याच्या सेवा सुविधा सुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.