नागपूर : विदर्भातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विदर्भातील शेती अधिक सक्षम व नफेखोर होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कृषी विकास केंद्र बारामतीचे संस्थापक संचालक प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार यांच्या सहकार्याने ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, भविष्यातील शाश्वत शेतीसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रमुख पिकांसाठी एआयचा वापर-
विदर्भातील ऊस, संत्रा आणि तूर या प्रमुख पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. याशिवाय सोयाबीन व कापूस उत्पादकांचे गट तयार करून त्यांनाही या उपक्रमात सहभागी केले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक नियोजन अधिक अचूक करण्यावर भर दिला जात आहे.
रिअल टाईम माहितीमुळे अचूक निर्णय-
या प्रकल्पांतर्गत वेदर स्टेशन, मृदा सेन्सर, ड्रोन आणि सॅटेलाईटच्या साहाय्याने मातीतील आर्द्रता, पावसाचे प्रमाण, तापमान आणि पिकांच्या आरोग्याची रिअल टाईम माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या माहितीच्या आधारे पाणी, खते आणि कीटकनाशकांचा वापर नियोजनबद्ध व आवश्यक त्या प्रमाणात करता येतो.
तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पिकांच्या उत्पादनातही ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे शाश्वत, नफा देणारी आणि पर्यावरणपूरक शेतीचा मार्ग मोकळा होत आहे.
शेतकऱ्यांसाठी नोंदणी व मार्गदर्शन-
एआय तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन आणि कृषी विकास केंद्र बारामतीकडून संयुक्तपणे तांत्रिक मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सहाय्य दिले जाणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी फॉर्म मागवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आधुनिक शेतीकडे वाटचाल-
जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम शेतीमालाच्या दरांवर होत असल्याने माहिती-आधारित शेती ही काळाची गरज बनली आहे. योग्य पीक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ पर्याय नसून, भविष्यातील समृद्ध आणि आत्मनिर्भर शेतीचा भक्कम पाया ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.









