नागपूर: वन आणि वन्यजीवांचे सरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनअधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ आज शनिवार दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी १०.३० वा. राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुख्यालय वनभवन येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री.जी.साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले.
या वेळी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळुन तसेच स्मारकावर पुष्प वाहुन वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली दिली. या प्रसंगी भारतीय वन सेवतील वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी, वनकर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मर्यादित संख्येत उपस्थित होते.
दिनांक ११ सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासात निसर्ग पुजक असलेल्या राजस्थानातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तिंनी खेजरली गावातील खेजडी वृक्षांच्या संरक्षणासाठी सन १७३८ ला दिलेल्या अतुलनीय प्राण बलिदानासाठी ओळखल्या जातो.
महाराष्ट्र राज्यात सुध्दा वनविभागातील वनअधिकारी तसेच कर्मचारी यांनी वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा देह धरातीर्थी ठेवला. त्या सर्वांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्या नागपूर येथील मुख्यालयी वनभवन, नागपूर येथे वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. यात रोजंदारी वनमजुर, वाहनचालक, वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे.