
नागपूर : हिंगणा तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेत मासेमारी करत असताना विजेचा धक्का लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव सदाशिव नामदेव मडावी असे असून ते किन्ही गावातील रहिवासी होते. १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास मडावी हे आपल्या गावाजवळील नाल्यात मासेमारीसाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारी करत असताना त्यांचा अचानक विद्युत प्रवाहाशी संपर्क आला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी किन्ही येथील आकाश रूपराव उईके (वय ३३) यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.








